Saturday, December 26, 2015

मी आदिशक्ती

भविष्यात कुठल्याही परिस्थितीत परत न करण्याच्या अटीवर एका कवी महोदयांना एक मानाचा पुरस्कार प्रदान केला गेला ! माझा त्यांच्याशी थोडासा परिचय असल्याने मला त्यांना पुरस्कार मिळणार असल्याचं आधीपासून माहीतच होतं. (हो. पुरस्कार मिळणार आहे, हे पुरस्कार जाहीर होण्याआधी माहित असतंच बहुतेकदा !) अभिनंदन करणं औपचारिक आणि आवश्यक होतं. त्यामुळे मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन केलं. पुरस्कार मिळालेला कविता संग्रह मुख्यत्वेकरून स्त्रीवादी कवितांचा होता. कवी महोदय अल्पावधीतच एक आश्वासक स्त्रीवादी कवी म्हणून नावारूपास आलेले होते. औपचारिक अभिनंदन केल्यावर दिवाणखान्यातल्या सोफ्यावर मी विसावलो, गप्पा सुरु झाल्या आणि कवी महोदयांनी फर्मान सोडलं. 'चहा आण गं !' काही मिनिटांनी त्यांच्या पत्नी दोन कप चहा, बिस्किटं वगैरे घेऊन आल्या. तो चहा आम्ही प्यायलो. माझा कप मी ट्रेमध्ये ठेवला. कवी महोदयांनी त्यांचा कप त्यांच्या बाजूच्या छोट्या कॉर्नर टेबलवर ठेवला. त्यांच्या पत्नी आल्या आणि तो कप उचलून ट्रेमध्ये ठेवून घेऊन गेल्या. जाता जाता त्यांना 'अमुक अमुक पुस्तक आण' म्हणून सांगितलं गेलं, त्यांनी ते आणून दिलं आणि कवी महोदयांनी त्यांच्या दुसऱ्या एका पुस्तकाची प्रत मला स्वाक्षरीसह दिली.
स्त्रीवादी कवी. त्यांच्या वास्तववादी कविता समाजात स्त्रीला मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीबद्दल ताशेरे ओढणाऱ्या, डोळ्यांत जळजळीत अंजन टाकणाऱ्या, कधी हळहळणाऱ्या, कधी निराश होणाऱ्या होत्या. ज्या वाचून महनीय समीक्षक वाहवा करत होते. आणि स्वत:च्या घरात मात्र, जिला 'लक्ष्मी' म्हटलं जात होतं, ती समोर चहाचा ट्रे आणत होती. आज्ञा स्वीकारत होती.

ह्या विरोधाभासाने मी मनाशीच खजील झालो.
घरी परत निघालो. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या माहितीतल्या शेकडो स्त्रिया भन्साळीच्या सिनेमात दाखवतात तसं काही एक संबंध नसतानाही एकत्र येऊन हसत, रडत, नाचत, बोलत होत्या. त्या सगळ्यांच्या प्रत्येक कृतीतून मला त्या डिवचत असल्याचा भास होत होता. त्यात अशिक्षित, सुशिक्षित, गृहिणी, नोकरदार, विवाहित, अविवाहित, यशस्वी, अयशस्वी, प्रसिद्ध, अप्रसिद्ध, परिचित, अपरिचित अश्या सगळ्या होत्या. 'घराकडे लक्ष देणे, मुलांना सांभाळणे, वडिलधाऱ्यांची सेवा करणे, स्वयंपाक अश्या सगळ्या जबाबदाऱ्या त्या सगळ्या पेलत होत्या. भारतीय स्त्री घराला जे हवं ते करत असते. राहुल द्रविड कसा संघाला हवं तर विकेटकीपिंग, नेतृत्व, सलामीचा फलंदाज, तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज, शॉर्ट लेगचा फिल्डर, स्लीपमधला फिल्डर अश्या सगळ्या भूमिका निभवायचा, तश्याच ह्या स्त्रिया. ह्या स्त्रिया व्यावसायिक आयुष्यात अत्युच्च शिखर गाठतात, तरी त्यांच्या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न हमखास विचारला जातो, 'घराची जबाबदारी कशी निभावली ?'

मला आठवलं. कसं आजही किती तरी लोकांना 'मुलगी' नकोच असते. 'मुलगी शिकली, प्रगती झाली' वगैरे गोंडस घोषणा आठवल्या. त्या किती पोकळ आहेत, हे जाणवलं. माझं लग्न ठरलं, तेव्हा एका ड्रायव्हरने बाबांना विचारलं होतं, 'किती हुंडा ठरला ?' बाबांनी 'हुंडा वगैरे काही नाही' म्हटल्यावर त्याला विश्वास बसेना ! त्याला एक मुलगा आणि एक मुलगी. जर मुलासाठी हुंडा घेतला नाही, तर मुलीसाठी हुंडा कसा देणार ? अशी त्याची भाबडी समस्या होती. हुंडा देणे आणि घेणे, हा आजही लोकांना अधिकार वाटत असताना नुसत्या घोषणा करून काय उपयोग होणार आहे ?

ह्या सगळ्या विचारात घरी आलो. समोर टेबलवर वर्तमानपत्र होतं. त्यात बातमी दिसत होती. त्यात लिहिलं होतं की, 'UN'च्या एका सर्वेक्षणात असं आढळून आलंय की स्त्री-पुरुष असमानतेत भारत पाकिस्तान आणि बांगलादेशच्याही पुढे आहे ! त्या बातमीत दिलेली आकडेवारी एक भारतीय म्हणून शरमेने मान खाली घालायला लावणारी होती. अर्थात, अशी सर्वेक्षणं कितपत विश्वासार्ह असतात, ह्यावरही वाद होऊ शकतो. मात्र महासत्ता होण्याचं, औद्योगिक केंद्र बनण्याचं स्वप्न पाहणारा भारत आजही स्वत:ची तुलना पाकिस्तानशी करण्यातच धन्यता मानतो आहे आणि त्यांच्यापेक्षा आपण सरस आहोत, ह्याचाच आनंद मानतोय हे विदारक आहे. पाकिस्तानचं जाऊ देऊ, पण जे पुढारलेले देश आहेत त्यांच्या तुलनेत आपण कुठे आहोत ? ह्या आकडेवारीचा तर उल्लेखही कुठेच नव्हता. म्हणजे ती तुलनासुद्धा होऊ शकत नव्हती.

बरोबर आहे. कशी होईल तुलना ? आजही, एका स्त्रीने देवाचं दर्शन घेतलं म्हणून आपण देवाचं शुद्धीकरण करतोय. देवाचं ? तेही मनुष्याने शुद्धीकरण करणं, ही कल्पनाच मुळात नारळाच्या झाडाला सादाफुलीने सावली देण्याचा प्रयत्न करण्यासारखी निरर्थक आहे. पण असो. मला सांगा, त्या शुद्धीकरणासाठी आणलेलं दूध बैलाचं होतं का ? की प्राण्यांमधली स्त्री वंदनीय आणि माणसातली मात्र अस्पृश्य ? पुरोगामी महाराष्ट्राची जर ही अवस्था असेल, तर उर्वरित भारताची आणि त्यातही ग्रामीण भागातल्या परिस्थितीची कल्पनाच न केलेली बरी !

मुळात 'समानता' म्हणजे काय, हेही समजून घ्यायला हवं. 'मी इतरांना समान वागणूक देतो', असं म्हणणंही चूक आहे. कारण तुम्ही समानता देत आहात, अशी जाणीवही व्हायला नको. ती अंगभूतच असायला हवी. हवं तर उलट म्हणा की, 'मी स्वत:ला इतरांसमान वागणूक देतो' !
'मी माझ्या बायको/ मुली/ बहिणीला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे!' असं लोक मोठ्या अभिमानाने सांगतात.
पण 'अरे तू कोण देणारा ? कुणालाही स्वातंत्र्य देण्याचा अधिकार मिळाला कुठून तुला ? त्यांचं स्वातंत्र्य जन्मसिद्धच होतं की !' असा विचार त्यांच्या मनाला स्पर्शही करत नाही.

माझ्या एका मित्राचं काही वर्षांपूर्वी लग्न झालं. मी लग्नाला जाऊ शकलो नव्हतो. पण नंतर त्याच्या घरी गेलो. त्याची बायको त्याला 'अहो-जाहो' करताना पाहून मला फार गंमत वाटली ! मी त्याला म्हटलं, 'अहो' काय अरे ! किती विचित्र वाटतं !'
त्यावर त्याने शांतपणे हसून उत्तर दिलं, 'अरे कुणी मान देत असेल, तर देऊ द्यावा की ! काय फरक पडतो !'
आपण भारतीय इतके चाकरीलोलुप आहोत, की जर कुणी आपल्याला त्याची जाणीव करून दिली तर ते आपल्याला पटतही नाही.

डोकं बधीर झालं. पेपर खाली ठेवला आणि कवी महोदयांचं पुस्तक उघडलं. पहिलीच कविता होती.. 'मी आदिशक्ती !'
कुत्सित हसलो आणि पुढची कविता मी वाचलीच नाही. मनातल्या मनात पुढच्या ओळींची मीच कल्पना केली -

'मी आदिशक्ती
माझ्या ह्यांच्या घरात धुणी-भांडी करते
चहा-पाणी बघते
स्वयंपाक करते
आणि माझ्यावरच्या कवितांमुळे
पुरस्कारही मिळवून देते'

- रणजित पराडकर

शुक्रवार, दि. २५ डिसेंबर २०१५ रोजी 'दै. दिव्य मराठी'च्या 'मधुरिमा' पुरवणीत प्रकाशित लेख -


Friday, December 18, 2015

भेलवाले (Movie Review - Dilwale)

'When you can't grow a beard, dont grow a beard.'
साधासाच फंडा आहे, पण काही गोष्टी इंग्रजीत सांगितल्याने भारी वाटतात ! मात्र हा साधासा फंडा शाहरुखला काही केल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही, हे एखाद्या सुपरस्टारने स्वीकारणे कठीणच म्हणा ! 'चक दे इंडिया' मधला 'कबीर खान' लोकांना आवडला होता ते त्याच्या दिसण्यामुळे नाही, हे त्याला कुणी तरी समजवायला हवे. त्याचा 'जब तक है जान' मधला दाढीचे खुंट वाढलेला बोगस फिल्मी मेजर लोकांनी सहन केला आणि आता परत एकदा तेच वाईट्ट खुंट घेऊन तो 'दिलवाले' बनलाय.
दाढीचं लक्षात येत नसेल, पण एक मात्र शाहरुखला नक्कीच लक्षात आलेलं आहे. 'आपण सेन्सिबल चित्रपट करू शकत नाही'. त्यामुळे 'चक दे इंडिया', 'स्वदेस' आणि बऱ्याचश्या प्रमाणात 'डॉन' वगळता सगळेच शाहरुखपट आणि सेन्सिबिलीटीचं नातं म्हणजे ३६ च्या आकड्यासारखंच असावं. ह्या बाबतीत दिग्दर्शकांमधला शाहरुख खान म्हणजे 'रोहित शेट्टी'. दोघे एकत्र पहिल्यांदा 'चेन्नई एक्स्प्रेस' मध्ये बसले. तो प्रवास जितका मनोरंजक (सेन्सिबल नाही, लक्षात घ्यावे!) तितकाच 'दिलवाले' रटाळ.
इथल्या शाहरुखच्या दाढीचे खुंट अधिकच अणकुचीदार आहेत. इतके की काही फ्रेम्समध्ये त्याला पाहताना नकळत आपण आपलाच गळा खाजवायला लागावं. त्याला असा गबाळा लुक का द्यावा, ह्यावर विचार करायची संधी वरुण धवन देत नाही. वरुण धवन हा वरून, खालून, आतून, बाहेरून, डावीकडून, उजवीकडून, समोरून, मागून सगळीकडून पक्का 'धवन' आहे. त्याचे तीर्थरूप आणि सेन्सिबिलीटी ह्यांचं नातं तर विळ्या-भोपळ्याचं ! त्यामुळे 'बदलापूर' पाहून जर वरुणकडून आपल्या काही अपेक्षा वाढल्या असतील, तर त्या अपेक्षांच्या फुग्याला निर्दयीपणे तो स्वत:च 'दिलवाले'ची टाचणी लावतो. ह्या लक्षणामुळेच 'कृती सॅनोन' नामक मूर्तिमंत मेक अप कीट वरुणसाठी अगदी 'परफेक्ट मॅच' ठरतो आणि दोघे मिळून पूर्णवेळ टाचण्या टोचून हैराण करून सोडतात ! सुरुवातीच्या काही दृश्यांत साक्षात खप्पड दिसणारी काजोल नंतरच्या दृश्यांत हळूहळू सुंदर दिसायला लागते आणि अखेरपर्यंत आपल्याला जाणवतं की तीच एक सहनीय व बघणीय भाग होती ह्या चित्रपटाचा.

खूप मोठी उंची गाठायला फार मेहनत लागते आणि तिथून खाली यायला काहीही लागत नाही. हे सोपं काम रोहित शेट्टीने शाहरुख-काजोलच्या जोडीबाबत व्यवस्थित केलं आहे. त्यांची सुप्रसिद्ध केमिस्ट्रीसुद्धा काही जादू करत नाही. कारण गाण्यांच्या चाली, त्यांची चित्रीकरणं, संवाद, प्रसंग हा सगळाच मालमसाला पद्धतशीर 'कॉपी+पेस्ट' केलेला आहे. 'गेरुआ' चं चित्रीकरण अत्यंत नेत्रसुखद असलं तरी त्यावरची 'सूरज हुआ मध्यम..', 'सुनता है मेरा खुदा..' वगैरे गाण्यांच्या चित्रिकरणाची छाप काही लपत नाहीच. 'जनम जनम जनम..' गाण्याच्या चित्रीकरणावर 'हम तुम' चा प्रभाव ठळकपणे जाणवतो. संवाद तर इतके बुळबुळीत आहेत की ते लिहिण्यासाठी पेनात शाईऐवजी साबण घातला असावा.



तर इथून तिथून जे काही हाताला येईल ते उचलून सगळं एकत्र टाकून केलेली ही जी 'दिलवाले' नामक भेळ आहे, तिला चवीसाठी कमी पडणाऱ्या मिठाइतकी कहाणीही आहे.
कोणे एके काळचा माफिया 'काली' (शाहरुख) आपलं जुनं आयुष्य बल्गेरियात सोडून गोव्यात आपल्या लहान भावासह येतो. जुनं आयुष्य सोडताना त्यात गुन्हेगारी जगत जसं आलं, तसंच आपलं प्रेमही येणारच. हे सुज्ञास सांगणे न लागे. त्याचं हे प्रेम म्हणजे मीरा (काजोल) त्याच्या प्रतिस्पर्धी डॉनची मुलगी असते. आता ते आयुष्य सोडून येण्याचं कारणही कळलं असेलच. तरी सांगतो. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या ईर्ष्येने आंधळे झालेले हे लोक आपापल्या जवळच्यांना गमवून बसतात आणि त्यासाठी एकमेकांना जबाबदार धरून वेगळे होतात. सॉरी ! इथे हीरोला 'क्लीन' ठेवणं गरजेचं असल्याने फक्त मीराच असा गैरसमज करून घेते. काली तर शाहरुख असल्याने तो असं काही करूच शकत नाही. मग काली शाहरुख आपलं आवडतं नाम धारण करतो. 'राहुल' नाही. 'राज'. (आता दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' ची केमिस्ट्री आणायची आहे म्हटल्यावर हे आवश्यकच नाही का ?) मात्र भूतकाळ असा पिच्छा सोडत नसतोच. कालीचा लहान भाऊ वीर (वरुण धवन) आणि मीराची लहान बहिण इशिता (कृती सॅनोन) प्रेमात पडतात आणि द रेस्ट इज नो मिस्ट्री.

अभिनय, कहाणी, संवाद, दिग्दर्शन हे सगळं सुमार असलं तरी ह्या सगळ्यांवर कडी करणारी एक गोष्ट अजून आहे. 'कर्कश्य पार्श्वसंगीत.' अमर मोहिले, तुम्हीसुद्धा ? प्रत्येक दृश्याला मागे ढणढणाट चालूच ! ती 'जनम जनम जनम..' ची धून तर वाजून वाजून वात आणते. दर वेळी शाहरुख-काजोलची नजरानजर झाली रे झाली की वाजवा रे 'जनम जनम जनम...' असं चित्रपटभर चालतं. जोडीला ढिश्युम-ढिश्युम, उडणाऱ्या गाड्या, आपटणाऱ्या गाड्या, धावणाऱ्या, गोल फिरणाऱ्या, करकच्चून ब्रेक मारणाऱ्या गाड्या, स्फोट, वगैरे शेट्टी-मसालासुद्धा ह्या कर्कश्यतेच्या अमानुषतेत भर घालतोच.

बोमन इराणीला वाया घालवल्याबद्दल जास्त कीव करावी की संजय मिश्राला वाया घालवल्याबद्दल हे सांगणं अवघड आहे. हे दोघे आणि जॉनी लिव्हर हेच त्यातल्या त्यात थोडीफार मजा करवतात.
छायाचित्रण नयनरम्य आहे. पण सौंदर्य आणि नीटनेटकेपणाचा अतिरेक जाणवतो. प्रत्येक फ्रेम श्रीमंत, सुंदर, डोळ्यांचं पारणं फेडणारी असायलाच हवी हा अट्टाहास चमचाभर कमी करून तो चमचा इतर घटकांत वाढवला असता, तर अडीच तासांचा चित्रानुभव अत्याचार न होता, किमान मनोरंजक तरी झाला असता. रोहित शेट्टीचा सिनेमा पाहताना मनोरंजन वगळता दुसरी कुठलीच अपेक्षा ठेवून प्रेक्षक येत नसतोच आणि बाजारात मनोरंजनाचा व्यापार इतका भरपूर आहे की जर तोही तुम्हाला मांडता येत नसेल, तर काय म्हणणार ! खरं तर काही म्हणून उपयोग नाहीच कारण कितीही सुमार असला तरी शाहरुखच्या नावावर तो शेकडो कोटी कमवून देईलच. भाड मे जाये सेन्सिबिलीटी, कलात्मकता वगैरे, माल तो अंदर आने दो !
बरोबर ना शेट्टी साहेब ?

रेटिंग - *

Sunday, December 06, 2015

बथ्थड चेहऱ्यांची रद्दड स्टोरी (Movie Review - Hate Story - 3)

शाळेत प्रत्येक वर्गात काही वात्रट, द्वाड पोरं असतात. त्यांना सगळे शिक्षक 'वाया गेलेले' म्हणत असतात. इतर 'सभ्य' मुलांपैकी कुणी मेहनती मुलगा जर त्या द्वाड मुलांच्यात रमताना आढळला, तर त्याची एक प्रेमळ कानउघाडणी होत असे. 'तू हुशार आहेस, मेहनती आहेस. अभ्यासाकडे लक्ष दे. त्या पराडकरच्या नादाला लागू नकोस.' असे डोस दिले जात असत. शर्मन जोशीचीही अशी प्रेमळ कानउघाडणी कुणी तरी करायला हवी. 'तू चांगला अभिनेता आहेस. मेहनती आहेस. विचारपूर्वक सिनेमे कर. त्या विक्रम वगैरेच्या नादी लागू नकोस. ते लोक तुला कधी 'ओम् भट् स्वा:' करतील, ह्याचा काही नेम नाही !

खरंच. का केला असेल शर्मन जोशीने हा 'हेट स्टोरी - ३' कळत नाही ! कुठे ते फेरारी की सवारी, रंग दे बसंती, थ्री इडियट्स वगैरे आणि कुठे हे 'सॉफ्ट पॉर्न' ! बरं असंही नाही की त्याच्या भूमिकेत काही विशेष आव्हानात्मक असावं. मग तिथे हा आपला वेळ का वाया घालवतोय ? बाकीच्या लोकांचं ठीक आहे. Beggars are no choosers. (भिखारी को भीख, जितनी मिलें ठीक !) झरीन खान, करण सिंग ग्रोवर, डेजी शाह वगैरेंना असंही कुणी चांगला दिग्दर्शक एखादी चांगली भूमिका देऊन एखाद्या चांगल्या चित्रपटाचं मातेरं कधीच करणार नाही. त्यामुळे हे ठोकळे जर एखाद्या बंडल चित्रपटात तितक्याच बंडल भूमिका मनापासून बंडल अभिनय करून सादर करत असतील, तर करोत बापडे ! तो एक क्रिकेटर मध्यंतरी झळकला होता. 'जोगिंदर शर्मा.' ट्वेंटी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मिसबाह उल हकने एक सपशेल मूर्खपणा केला आणि फालतू शॉट मारून आपली विकेट जोगिंदर शर्माला आणि विश्वचषक भारताला बहाल केला. जोगिंदरला क्षणभर वाटलं असावं की तो 'सुपर स्टार' झाला. पण आज त्याला पाणी नेऊन देण्याच्या कामापुरतासुद्धा संघात घेत नाहीत. हे झरीन, करण, डेजी इत्यादी लोक्स म्हणजे चित्रपटातले 'जोगिंदर शर्मा' आहेत. शर्मन जोशीसारख्याने ह्यांच्यात किती रमावं, हे त्याला समजून आलं असावंच. नसलंच तर मात्र 'अल्लाह मालिक !'

चित्रपटाची बकवास कहाणी थोडक्यात अशी -

आदित्य दीवान (शर्मन जोशी) हा एक तरुण व प्रचंड यशस्वी उद्योजक आहे. विविध क्षेत्रांत त्याच्या 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' ची जोरदार घोडदौड सुरु आहे. त्याची सुविद्य व बलदंड पत्नी सिया (झरीन खान) त्याच्या ह्या प्रवासात त्याच्या सोबतीने नेहमीच एका आदर्श सहचारिणीसारखी उभी राहत आली आहे. (हे तिचं उभं राहणं सहचारिणीपेक्षा अंगरक्षकासारखं वाटतं मात्र.) आदित्यसोबत काम करणारी काया (डेजी शाह) ही एक मेहनती व हुशार व्यवस्थापक आहे. 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' च्या यशात तिचाही हातभार खूप मोलाचा आहे. अचानक एक दिवस एक अनोळखी व्यक्ती आदित्यकडे मैत्रीचा हात पुढे करते. ही व्यक्ती म्हणजे सौरव सिंघानिया (करण सिंग ग्रोवर). सौरव 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज' मध्ये आदित्य म्हणेल तितके पैसे विना व्याज, विना तारण गुंतवायला तयार असतो. मात्र त्याची एक अशी विचित्र मागणी असते, जी एक आदर्श पती कधीच पूर्ण करू शकणार नसतो. सौरवच्या येण्याने 'दीवान ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज', आदित्य, सिया आणि कायाचा पुढील प्रवास कोणकोणती वळणं घेतो आणि कुठे जाऊन संपतो ही झाली 'हेट स्टोरी ३'.

गळक्या छत्रीतून पाणी हळूहळू ओघळत आत येतं. पण ह्या कथानकाच्या छत्रीला तर भोकंच भोकं आहेत. ही भोकं लगेचच अजून वाढत जातात, कथानक नावाचं कापड फाटून उडून जातं. आणि मग दिग्दर्शकाच्या हातात फक्त मूठ आणि छत्रीचा दांडा राहतो. चिंब होऊन कुडकुडणाऱ्या मनोरंजनात जरा 'ऊब' आणण्यासाठी मग तो भरपूर गरमागरम दृश्यं पेरतो.
पण 'हेट स्टोरी' ला 'हॉट स्टोरी' करायचा त्याचा हा प्रयत्न केविलवाणाच ठरतो.
कारण मुख्य स्त्री भूमिकेतली झरीन खान म्हणजे सतत एक मैद्याचं पोतं वाटत राहते. तिला सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात वापरलेला सगळा मेक अप तिला सुंदर न बनवता भयावह बनवतो. तर डेजी शाहला पाहूनही आनंद होण्यासारखं काही वाटत नाही ! चारही मुख्य पात्र पुरुषीच वाटतात. त्यांतल्या दोघांनी पुरुषाची आणि दोघांनी स्त्रीची वेशभूषा केली आहे, असंच वाटतं.

ह्या बंडल चित्रपटाचं श्रेय सुमार पटकथेसाठी विक्रम भट्टना द्यावं की झोपाळू दिग्दर्शनासाठी विशाल पंड्याना हे सांगता येणं कठीण आहे. त्यामुळे आपण हे श्रेय दोघांना विभागून देऊ !
'संगीत म्हणजे ढणढणाट' हे सूत्र पाळणारे अनेक फुटकळ संगीतकार अचानकच भूछत्रांसारखे गेल्या काही वर्षांत उगवले आहेत. कधी कधी वाटतं की ह्यांच्या कामाला अनुल्लेखानेच मारावं. आपलं काम पाहून 'हे कुणी केलं आहे' अशी उत्सुकताही कुणाला वाटू नये, ही एखाद्या कलाकारासाठी एक अतिशय शरमेची बाब आहे. आताशा बहुतांश हिंदी चित्रपटांचे संगीत ऐकताना खरोखर 'संगीतकार कोण?' ही उत्सुकताच वाटत नाही. (आणि जर वाटलीच तर 'शिव्या नेमक्या कुणाला घालायच्या' ह्यासाठीच वाटत असावी !)

'हेट स्टोरी - ३' मधून टवाळांच्या हाती काही लागणार नाही आहे आणि रसिक तर अश्या चित्रपटांकडे ढुंकूनसुद्धा पाहत नाहीतच. ह्या चित्रपटाला जर श्रेय द्यायचंच झालं तर एकच देता येईल. ते म्हणजे, 'शर्मन जोशीने काय करू नये', हे ह्या चित्रपटाने प्रत्यक्ष दाखवून दिलं आहे.

रेटिंग - *

हे परीक्षण दै. मी मराठी लाईव्ह मध्ये आज ०६ डिसेंबर २०१५ रोजी प्रकाशित झालं आहे - 


Tuesday, December 01, 2015

कट्यार काळजात घुसली - Another Take

चित्रपट 'कट्यार काळजात घुसली' बराच गाजतो आहे. तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटगृहं चांगलीच गर्दी खेचत आहेत. अपेक्षेविपरित ह्या यशाकडे भेदभावाच्या एका विकृत नजरेतूनही पाहिलं जातंय. मी त्या विषयी बोलणार नाही. मात्र मला तो इतका का आवडला, ह्यावर जरासा विचार केला. इतरांना का आवडला नसेल, ह्याचाही अंदाज घेतला. तेच मांडतोय.

मूळ 'संगीत कट्यार काळजात घुसली' हे ज्यांनी पाहिलं असेल, त्यांना चित्रपट ककाघु कदाचित आवडणार नाही. ह्याची काही कारणं आहेत -
१. पंडितजी व खांसाहेब ह्यांच्या घराण्यांतला संघर्ष चित्रपटात नीट आलेला नाही. पूर्वी घराण्यां-घराण्यांत चढाओढ असायची आणि दुसऱ्या घराण्याच्या कलाकारांना कुणी शिकवत नसत. प्रत्येकाला आपापल्या घराण्याचा पराकोटीचा अभिमान असायचा. ह्या संदर्भातले मोठमोठ्या कलाकारांचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. ह्या पातळीचे मतभेद चित्रपटात न येता ते एक सूडनाट्य होण्याकडे त्याचा कल अधिक वाटतो. थोडक्यात त्याला 'फिल्मी' केलंच आहे.
२. खांसाहेब ही व्यक्तिरेखा चित्रपटात खूपच खलप्रवृत्तीची झाली आहे. मूळ नाटकांत खांसाहेबला असलेली कलेविषयीची ओढ आणि सदाशिवच्या गाण्याबद्दल असलेला आदर चित्रपटात क्वचित दिसतो.
३. उमा-सदाशिवचं प्रेमप्रकरण, सदाशिवचं अचानक कुठून तरी उगवणं, त्याचा आगा-पिच्छा कथानकात कुठेच पुरेसा न उलगडणं अश्या सगळ्या तर साफ गंडलेल्या गोष्टीही चित्रपटात आहेत.
४. ह्याव्यतिरिक्त अजूनही काही लहान-सहान उचक्या घेतल्या आहेत अध्ये-मध्ये.

हा सगळा एक भाग झाला. पण दुसरं असंही आहे -
'ककाघु' चित्रपट बनवताना जर मूळ नाटकात काहीही बदल न करता, जशीच्या तशी संहिता घेतली असती, गाणीही तीच घेतली असती, तर लोकांनी म्हटलं असतं की, 'स्वत:चं contribution काय ? ही तर माशी-टू-माशी नक्कल आहे !'
मूळ संहितेपासून थोडी फारकत घेतली, काही गाणी नवीन टाकली, काही बदलली तर लोकांना त्यातही गैर वाटतंय.
थोडक्यात काहीही केलं तरी तुलना अटळ आणि जिथे ही तुलना होणार तिथे 'जुनं ते सोनं' आणि मी माझ्या परीक्षणात म्हटल्याप्रमाणे 'महान कलाकृती एकदाच बनतात, नंतर त्यांच्या प्रतिकृती बनू शकतात' ह्यानुसार 'चित्रपट ककाघु' वर टीका होणारच, हे चित्रपट करण्यापूर्वी करणाऱ्यांना माहित नसेल का ? १००% माहित असणार. तरी त्यांनी ही हिंमत केली. स्वत:चं डोकं लावलं, बदल केले. ते आवडले किंवा नावडले, हा वेगळा विषय. पण ते चित्रपटकर्त्यांनी केले, हे त्यांचं औद्धत्य नसून, त्यांची हिंमत आहे आणि तिला दाद द्यायलाच हवी.

हो. स्वतंत्रपणे एक चित्रपट म्हणूनच विचार केला तर चित्रपटात उणीवा आहेत. पण त्या उणीवांवर मात करणाऱ्या दोन गोष्टी चित्रपटात आहेत.
१. सर्वच्या सर्व कलाकारांचा उत्तम अभिनय.
२. दमदार संगीत. (जुनं + नवं)

आता परत हे दोन्ही मुद्दे सापेक्ष असू शकतात. सचिनचा 'खांसाहेब' म्हणून अभिनय अनेकांना 'अति-अभिनय' (Over acting) ही वाटला आहे. पण मला तरी तो तसा वाटला नाही. मुळात तो एक चांगला अभिनेता आहेच, बाकी ते महागुरू वगैरे काहीही असो. त्याला संगीताची उत्तम जाणही आहेच. त्याने केलेला गाण्याचा अभिनय मला तरी कन्व्हीन्सिंग वाटला.

संगीत जर कुणाला आवडलं, नसेल तर असो. माझ्या संगीताच्या समजेबद्दल मला कुठलेही न्यूनगंडदूषित गैरसमज नाहीत. त्यामुळे मला 'तमाशा'चं संगीत भिकार आहे आणि 'कट्यार..' अप्रतिम आहे, असं म्हणायला हिंमतही करावी लागत नाही आणि इतर कुणाच्या मतांमुळे माझं मतही बदलत नाही ! देस रागावर आधारलेलं 'मनमंदिरा तेजाने उजळून घेई..' असो की अगदी मुरलेल्या गायकाने बांधलेल्या बंदिशीच्या तोडीचं 'दिल की तपिश..' असो, मी तिथे केवळ गुंग आणि नतमस्तक होतो. 'आफताब' वाली सम तर अशी आहे की अक्षरश: जान निछावर करावी !

आधीच म्हटल्याप्रमाणे 'नाटक' आणि 'चित्रपट' ह्यांतली तुलना अटळच आहे. मात्र म्हणून बळंच 'नाटकाची सर नाहीच', 'नाटक पाहिलं नाही, त्याचं जीवन व्यर्थ' वगैरे म्हणत नाकं मुरडणं म्हणजे शुद्ध बाष्कळपणा वाटतो. मुळात दोन माध्यमांत असलेला प्रचंड फरकच इथे लक्षात घेतला जात नाहीये. काही उणीवा नाटकातही आहेत आणि काही चित्रपटातही. किंबहुना, उणीवा ह्या सहसा असतातच असतात. अगदी १००% दोषरहित निर्मिती क्वचितातल्याही क्वचित होत असते. त्या उणीवांना झाकता येईल अशी इतर बलस्थानं असणं महत्वाचं आहे. एक व्यक्ती म्हणून आपल्या सगळ्यांतच दुर्गुण असतात. ते दुर्गुण दुय्यम ठरावेत असे काही सद्गुण अंगी बाणवणं, हा झाला व्यक्तिमत्व विकास. तेच इथे लागू व्हायला हवं.

चित्रपट त्यातील उणीवांसकट अभूतपूर्व आहे, ह्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका नाही. मी माझं मत कुणावर लादणार नाही. ज्याला जे मत बनवायचं ते बनवण्यासाठी तो/ ती मोकळे आहेत. मी काल जेव्हा तिसऱ्यांदा 'ककाघु' पाहिला तेव्हा तो पुन्हा तितकाच आवडला. 'सूर निरागस हो..' ने तल्लीन केलं. 'दिल की तपिश..' ने शहारे आणले. 'मनमंदिरा' ने भारुन टाकलं. 'यार इलाही..' ने जादू केली. ही सगळी नवी गाणी मला 'तेजोनिधी..', 'घेई छंद..', 'सुरत पिया की..' च्याच तोडीची वाटली.

तीन वेळा थेटरात पाहिला. आता टीव्हीवर आला की परत पाहीन.
असा चित्रपट, असं संगीत पुन्हा होणे नाही.

- रणजित पराडकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...