Monday, February 17, 2014

येडे गुंडे (Movie Review - Gunday)

काळा. काळ्या रंगाचं एक वेगळंच वैशिष्ट्य आहे. त्याच्यासोबत इतर कुठलाही रंग शोभतो, उठून दिसतो. 'मॅच' होतो. काळा रंग पार्श्वभूमीवर असला तर लहानात लहान नक्षी, वस्तूसुद्धा स्पष्ट होते. थोडक्यात काहीही 'खपवायचं' असेल, तर काळा जवळ करावा ! पांढरा रंगही असाच सर्वसमावेशक आणि वैश्विक. पण त्याचा शुभ्रपणा टिकवण्यासाठी प्रचंड काळजी घ्यावी लागते, तितकी काळ्याचा गडदपणा टिकवण्यासाठी घ्यावी लागत नाही. इतकं लक्षात आलं की बास्स ! एक १००% यशस्वी कथानक गुंफता येतं. एक रंग मनाचा - काळा - भरला की बाकी रंग अगदी तैयार उपलब्ध आहेतच ! थोडा दोस्तीचा पिवळा, थोडा प्रेमाचा गुलाबी, थोडा कायद्याचा पांढरा आणि रक्ताचा लाल. कॅनव्हासवर रंग फेका, रेघोट्या ओढा की चित्र तयार !

'गुंडे'मध्ये असे काहीही नाही, जे आधी दाखवले गेले नाही. जे आधी आपण पाहिले नाही. किंबहुना ट्रेलर बघून आपल्याला कहाणीचा जो अंदाज येतो, त्या अंदाजालाही 'गुंडे' चुकवत नाही. ह्या चित्रातले सगळे रंग, चित्रकाराने भरायच्या आधीच आपण ओळखलेले असतात, ते तसेच भरले जातात, तिथेच भरले जातात आणि तेव्हढेच !

१९७१. भारत-पाकिस्तान युद्धानंतर 'बांगलादेश' जन्माला आला आणि अनेक विस्थापित भारतात आले. ह्या विस्थापितांत असतात 'बिक्रम' आणि 'बाला' हे दोघे मित्र. हे दोघे लहानगे उपासमारीमुळे कासावीस असताना 'लतीफ' हा बंदुकांचा स्मगलर त्यांना आसरा देतो आणि त्याचे 'हुकमी हस्तक' बनवतो. पण वखवखलेल्या मिलिटरी ऑफिसरच्या 'भुके'पासून स्वत:ला वाचवण्यासाठी दोघे जण त्या ऑफिसरचा खून करतात आणि पळून कलकत्त्यास येतात. इथेही आयुष्य त्यांच्यासाठी सरल नसतंच. सततच्या बिकट परिस्थितीमुळे लहान वयातच गुन्हेगारी प्रवृत्ती बळावत जाते आणि गैरमार्गाने का होईना पण ह्या कलकत्त्यावर राज्य करायचं, ही दुर्दम्य महत्वाकांक्षा दोघांच्या मनात बीज धरते. कोळश्यापासून सुरुवात करून मासळी, लोखंड, जमीन अश्या विविध क्षेत्रात हे दोघे आपला काळा धंदा पसरवतात आणि कलकत्त्यावर हुकुमत गाजवणारे कुख्यात गुंड बनतात. गुंड असले, चोर असले तरी 'हीरो' आहेत त्यामुळे त्यांचा काळा पैसा ते शाळा, इस्पितळं, अनाथालय ह्यांसाठीही वापरतात आणि गोरगरीबांत एक प्रकारची इज्जतही कमावतात.
पण कितीही चिकणे, बॉडी बिल्डर, हीरो असले तरी असतात गुंडच, त्यामुळे खलनिग्रहणाय एसीपी सत्यजित सरकार (इरफान खान) येतो. त्याचे काम सोपे करण्यासाठी वर्षानुवर्षं १००% यशस्वी ठरलेला फॉर्म्युला म्हणून दोघा मित्रांमध्ये फुट पाडायला एक ललना 'नंदिता' (प्रियांका चोप्रा) येते. सगळे तसेच घडते, जसे आपल्याला वाटत असते, जसे आपण ह्यापूर्वीही अनेकदा पाहिलेले असते. (खरं तर मी अगदी शेवटपर्यंत सगळं सांगून टाकलं तरी 'स्पॉयलर' ठरणार नाही, अशी माझी पूर्णपणे खात्री आहे पण तरी पुढचं सांगत नाही.)


'बिक्रम'च्या भूमिकेत 'रणवीर सिंग' आणि 'बाला'च्या भूमिकेत 'अर्जुन कपूर' काही विशेष मजा आणत नाहीत. गॉन आर दोज डेज, जेव्हा संताप दाखवताना अभिनेते डोळ्यात निखारे आणत. आता फक्त गाल थरथरवतात. ह्या दोघांच्याही अभिनयाची परिसीमा तिथपर्यंतच असावी. दोन्ही भूमिकांत खरं तर छाप सोडण्यासाठी बराच वाव होता. परंतु, जो विद्रोह, असंतोष ह्याआधी अमिताभ, संजीव कुमार, धर्मेंद्र, सनी देओल, वगैरेंनी आपापल्या शैलीत अफलातून दाखवला आहे, त्याच्या आसपासही बिक्रम आणि बाला पोहोचत नाहीत. पाटा खेळपट्टीवर ६० चेंडूत ४० धावा काढणारा फलंदाज जितका छाप सोडतो, तितकीच छाप हे दोघेही सोडतात.

प्रियांका चोप्रा बऱ्याच काळानंतर एका बऱ्या, काही तरी किंमत असलेल्या भूमिकेत दिसली आहे. मला फारशी आवडत नसली तरी इतर अनेक बाहुल्यांपेक्षा कैक पटींनी सरस आहेच. त्यामुळे तिच्या ह्या चित्रपटनिवडीबद्दल तिचे अभिनंदन !

इरफान खान, स्वत:ची अभिनय शैली असलेले फार कमी अभिनेते असतात त्यापैकी एक. अश्या अभिनेत्यांना पिळदार देहयष्टी, चिकना चेहरा वगैरेची आवश्यकता नसते. इरफान खान अत्यंत सहजतेने एसीपी सरकार साकारतो. त्याच्यासाठी ही भूमिका तशी खूपच सोपी म्हणायला हरकत नाही. बहुतेक एकही री-टेक वगैरे न घेता किंवा सीनही न ऐकता त्याने आपलं काम चोख केलं असावं.

'शोले', 'दीवार' किंवा अगदी आजकालचा 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई' किंवा 'आन', 'खाकी' ई. काही कथानकंच अशी असतात, की त्यांची जोरदार संवादांची मागणीच असते. किंवा असं म्हणू की तिथे परिस्थितीनुरूप सहजपणे जोरदार संवाद जन्मच घेतात. पण 'गुंडे' सगळ्यात जास्त निराशा इथेच करतो. काय तर म्हणे - 'हम गुंडे थे, गुंडे है और गुंडेही रहेंगे !' अत्यंत पांचट संवाद अपेक्षाभंग करतात.

'सोहेल सेन' चं संगीत बऱ्यापैकी श्रवणीय आहे. ही गाणी पहिल्यांदा ऐकताना तरी अत्याचारी किंवा कंटाळवाणी वाटली नाहीत. आजच्या काळात हे सिनेसंगीतकाराचे एक जबरदस्त यशच मानावे.

खरं तर १९७१ च्या युद्धानंतर निर्माण झालेला 'बांगलादेश' हा भाग १९४७ सालीच भारतापासून वेगळा झालेला होता. हा स्वतंत्र देश अस्तित्वात आला तो पाकिस्तानचा तुकडा पडून आणि जे काही लोक तिथून भारतात आले, ते युद्धापूर्वीच पाकिस्तानच्या जाचाला कंटाळून आले होते. किंबहुना, प्रचंड प्रमाणात येणारे विस्थापितांचे लोंढे, त्यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेला बंगालच्या सुव्यवस्थेवरील ताण हेसुद्धा ह्या युद्धाचं व स्वतंत्र देशनिर्मितीचं एक महत्वाचं कारण होतं. 'अधिकृतरीत्या' त्या भागातून भारतात येणारे लोक खरं तर युद्धानंतर थांबले होते. १९७१ साली कुठली तरी नवीन सीमारेषा आखली गेली होती, त्यामुळे भारताचाही काही भाग बांगलादेशात गेला आणि त्यामुळे कालपर्यंत भारतीय असलेले काही लोक अचानक विस्थापित झाले, हे करुण, भेदक वास्तव म्हणजे मला 'गुंडे'मुळे मिळालेलं इतिहासाचं लेटेस्ट अपग्रेडेड व्हर्जन आहे.
बरं, कहाणीत असंही काही नाही की ती कुठल्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरच घडायला हवी होती. कारण 'व्हिक्टीम्स ऑफ सिस्टीम' तर कसेही पैदा होतातच. पण तरी हे ठिगळ जोडलंय. जुन्या इतिहासाचा चुकीचा अन्वयार्थ अनेकदा लावला गेलाय पण इतक्या नव्या इतिहासाचाही विपर्यास करावा, ही एक बौद्धिक दिवाळखोरीच. त्याहीपेक्षा वाईट हे की, अशी दिवाळखोर निर्मितीही भरपूर गल्ला जमवेल, पुरस्कार मिळवेल आणि 'स्टार्स' जन्माला घालेल. मग उद्या हेच 'स्टार्स' एखाद्या टीव्ही शोमध्ये येतील आणि 'कॉफी विथ करण' मध्ये आलेल्या 'स्टुडन्ट ऑफ द इअर' वाल्या वरुण धवन आणि आलिया भटनी दिलेल्या उत्तरांप्रमाणे, 'भारताचे राष्ट्रपती 'डॉ. मनमोहन सिंग' किंवा 'पृथ्वीराज चव्हाण' आहेत', असे अकलेचे तारे तोडतील.

असो !
हम येडे थे, येडे है और येडेही रहेंगे !

रेटिंग - *१/२  

Friday, February 14, 2014

मधुबाला

डोळ्यांत तुझ्या आकाश पसरले आहे
की पापणीपुढे सागर खळखळ करतो ?
का सौंदर्याला क्षणैकतेची जोडी ?
का मादकतेला कारुण्याची झालर ?

तू एक गूढ जे कधी उकलले नाही

मज प्रश्न सतवती वर्षांमागुन वर्षे
अन् उत्तर देणे वेळ दवडणे वाटे !
तुज निरखुन बघणे हाच सोहळा माझा
त्या अबोल अधरांमधेच जग सामावे

पण इतके नाही सोपे तुझ्यात रमणे

का प्रश्न कधीही आपण होउन विरती ?
बेसावध वेळी पछाडती मन माझे
मग निष्कर्षाप्रत येतो मीच अश्या की -
'हे रूप मानवी नसे, ईश्वरी आहे'

हे असे मानले की मी निवांत होतो

............ डोळ्यांत तुझ्या आकाशच पसरुन आहे
............ अन् त्या आकाशी सागर खळखळ करतो..

आकाश नि सागर एकच असते किमया !
त्या अथांगतेचे रूप असे 'मधुबाला' !!

....रसप....
१४ फेब्रुवारी २०१४
'मधुबाला डे'

Tuesday, January 28, 2014

आयुष्या

मला मी पाहिले आहे तुझ्या डोळ्यात आयुष्या
स्वत:चा चेहरा बघशील का माझ्यात आयुष्या ?

तिची ओवी, तिची गाणी पुन्हा गाणार असशिल तर
मुखी दे घास माझा अन् भरड जात्यात आयुष्या

मला थोडा विसावा एव्हढ्यासाठी हवा असतो
नव्याने बाण आणावेस तू भात्यात आयुष्या

किती गझला मुसलसल बांधल्या आहेस माझ्यावर
कसे मांडू तुला मी एकट्या मिसऱ्यात आयुष्या ?

तुझ्याशी सख्यही नाही, तुझ्याशी वैरही नाही
म्हणूनच वाटतो आहेस तू नात्यात आयुष्या

तुझे रुसवे, तुझ्या खोड्या, तुझा संताप, तक्रारी
किती हकनाक होऊ खर्च आयुष्यात आयुष्या ?

....रसप....
२७ जानेवारी २०१४ 

Friday, January 17, 2014

विरामचिन्हे

काही परकी
काही माझी
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..

जिथे न सुचले
शब्द समर्पक
अथवा होते
रुतले, फसले
जिथे मनाचे
विचारचक्रच
तिथे मांडली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे

अवखळ, अल्लड
हळवी, कातर
उदासीन वा
अनवट, अवघड
फक्त निरर्थक
असती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे

विरामचिन्हे
वगळुन बघता
आयुष्याला
व्यापुन उरते
अर्थहीनता
आणि व्यर्थता

तेव्हा मग मी
पुन्हा एकदा
पेरत बसतो
मीच जी कधी
अभावितपणे
वेचली जरा
आणि लपवली
होती काही
आयुष्याच्या
लेखामधली
विरामचिन्हे..

....रसप....
१६ जानेवारी २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...