Tuesday, November 26, 2013

अनुभूती

कितीदा मनाला उभारी दिली मी
कितीदा नवी जिद्द मी बाणली
तरी सांज प्रत्येक घेऊन येते
निशेची निराशामयी सावली

इथे एकदा काळजाने झरावे*
जशी पाझरे पश्चिमा सावळी
निळाई मुक्याने जरा सावळावी
भरावी जरा लोचनांची तळी

तळातून गहिऱ्या उफाळून यावे
जुने साचलेले तरी सोवळे
मनातून माझ्या कुणी व्यक्त व्हावे
जरा मुक्त व्हावीत ही वादळे

कुणी हारले सर्व काही तरीही
मला जिंकवाया पडावे कमी
दिसे फक्त आनंद ओसंडता पण
स्वतःशीच आहे पराभूत मी

....रसप....
१६ नोव्हेंबर २०१३
*ओळ 'श्री. प्रसाद जोशी' ह्यांची. 

No comments:

Post a Comment

Please do write your name.
आपलं नाव नक्की लिहा!

Related Posts Plugin for WordPress, Blogger...